‘मी वाचतो भरपूर; पण सर्व लेखकांच्या तुलनेत ‘पुलं’विषयी एक वेगळी आपुलकी आहे, जवळीक आहे....’ हे विचार आहेत आजच्या पिढीतला अभ्यासू अभिनेता आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकात साक्षात ‘पुलं’चीच भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलेला रंगकर्मी आनंद इंगळे याचे. ‘पुलं’च्या जयंतीनिमित्त आनंदनं त्यांच्याबद्दलच्या भावना ‘बाइट्स ऑफ इंडिया’कडे व्यक्त केल्या.
.............
आनंद इंगळे हा पुण्यातला अत्यंत अभ्यासू आणि बुद्धिमान रंगकर्मी. गेल्या काही वर्षांतल्या ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’, ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘नऊ कोटी ५७ लाख’ यांसारख्या अनेक नाटकांतून जबरदस्त अभिनय करणारा हा कलाकार तितकाच विचक्षणी वाचकसुद्धा आहे, हे त्याच्या बोलण्यातून जाणवतं. त्याची वैचारिक जाणीव प्रगल्भ आहे आणि साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत सजग आहे.
त्याने ‘पुलं’बद्दल व्यक्त केलेले हे विचार त्याच्याच शब्दांत -
माझ्या जगण्यावर ‘पुलं’चा प्रचंड प्रभाव आहे. ‘पुलं’च्या साहित्याचे संस्कार लहानपणापासूनच होत आहेत. अत्यंत निखळ विनोद हे त्यांचं वैशिष्ट्य आणि स्वतःवरसुद्धा विनोद करू शकण्याची क्षमता त्यांच्या साहित्यात आहे हे फार मोठं आहे. मी वाचतो भरपूर, खूप पुस्तकं आहेत; पण सर्व लेखकांत ‘पुलं’विषयी एक वेगळी आपुलकी आहे, जवळीक आहे. ‘पुलं’च्या लेखनात ‘बिटवीन दी लाइन्स’ जे असतं, ते खूपच महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ - ‘हल्ली माझा चेहरा पूर्वीसारखा टवटवीत दाखवणारे आरसे मिळेनासे झाले आहेत’ - हे वाक्य. म्हणजे माझ्यामध्ये झालेला बदल अलीकडे मलाही पूर्वीसारखा दिसत नाही, हे सांगणं किती सहज आहे बघा.’
चांगल्याला चांगलं म्हणायची सोय आणि वाईटाला वाईट म्हणण्याची मुभा ‘पुलं’च्या लेखनानं आपल्याला दिली आहे. आजकालच्या जगात दुर्दैवाने प्रत्येकाला दुसऱ्याचं म्हणणं पटतच नाही अशी परस्थिती आहे. ‘दुसऱ्याला आपल्याइतकं निर्वेधपणे जगू द्यायला यायला हवं,’ असं पुलं म्हणाले होते ते आजच्या जगात फारच महत्त्वाचं ठरतंय. आणि हे ज्या अशिक्षितांना कळत नाही आणि जे इतरांना भडकावतायत त्यांनी आजच्या काळात ‘पुलं’ असते, तर त्यांनाही मारायला कमी केलं नसतं.
‘पुलं’च्या साहित्याने मला अभिनेता म्हणून आणि माणूस म्हणून समृद्ध केलंय. ‘व्यक्ती आणि वल्ली’ या त्यांच्या पुस्तकाच्या नाट्यरूपांतरात खुद्द त्यांचीच भूमिका साकारायला मिळणं, यापरतं भाग्य ते काय!